शिक्षणाचे ध्येय आणि शिक्षणाने साध्य
करावयाच्या गोष्टी विसरलेली सध्याची शिक्षणपद्धत
शिक्षणाचे ध्येय :
१. ‘विद्यार्जन करणे हा शिक्षणाचा मुख्य हेतू
२. ‘सा विद्या या विमुक्तये’ : आपली दुःखे नाहीशी करून आपणाला सतत आनंद कसा मिळेल, याचे ज्ञान ज्याने मिळते ती विद्या.
शिक्षणाने साध्य करावयाच्या गोष्टी :
१. ज्ञानसंवर्धन आणि बुद्धीमत्तेचा विकास
२. आपल्या शिकवण्यातील कसब आणि नैपुण्य
३. जीवनातील नैतिक मूल्यांचे संगोपन आणि संवर्धन
४. चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्त्व घडवणे
५. आपला सांस्कृतिक वारसा सुधारणे आणि तो पुढच्या पिढीस देणे
६. आपल्या जीवनाचे ध्येय काय असावे, ते साध्य कसे करावे, याचे मार्गदर्शन करणे
७. विध्यार्थ्यांची आदर्श नागरिक म्हणून जडणघडण करणे
सध्याची शिक्षणपद्धती
हुशार विद्यार्थी चांगले गुण मिळवून आधुनिक वैद्य, अभियंता किंवा मोठे अधिकारी होणे; पण ते सुखी, समाधानी होतीलच, याची निश्चिती नसणे : सध्याच्या शिक्षणपद्धतीत मुलाला जास्तीतजास्त गुण मिळवून त्याला आधुनिक वैद्य, अभियंता किंवा इतर चांगल्या व्यवसायात कसा प्रवेश मिळेल, इकडेच पालकांचे, तसेच विध्यार्थ्यांचे लक्ष असते. समाजसुद्धा शिक्षणसंस्थांचा निकाल किती प्रतिशत लागला, केवळ याच निकषावर ती चांगली कि वाईट ठरवत असतो. हे गुण मिळवण्यासाठी शिक्षक विध्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव, अधिक घंटे घेणे, टाचण (नोट्स) देणे, यांद्वारे मार्गदर्शन करत असतात. हुशार विद्यार्थी भरपूर अभ्यास केल्याने चांगले गुण मिळवून आधुनिक वैद्य, अभियंता किंवा मोठे अधिकारी होतीलही; पण ते सुखी, समाधानी होतीलच, याची निश्चिती नसते.
प्रत्येक कृती ही धर्माने घालून दिलेल्या नियमांत बसवूनच करणे, असे भारतीय संस्कृती सांगत असणे : पूर्वी विध्यार्थ्याला मुंज झाल्यावर गुरुगृही धर्माचे शिक्षण दिले जात असे. त्याच्या आयुष्याचे ध्येय म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार आहेत, हे त्याच्या मनावर ठसवत असत. प्रत्येक कृती ही धर्माने घालून दिलेल्या नियमांत बसवूनच करावी, असे भारतीय संस्कृती सांगते.
अध्यापन ही साधना म्हणून करण्यास
प्रारंभ केल्यानंतर शिक्षकांनी लक्षात ठेवावयाची सूत्रे
आपला आदर्श विध्यार्थ्यांसमोर ठेवणे : केवळ उपदेश न करता स्वतःचे आचरण आणि विचार कसे असायला हवे, याचा अभ्यास शिक्षकाने करायला हवा; कारण समोर बसलेला विद्यार्थी हा शिक्षकाकडून त्याच्या प्रत्येक कृतीचे अनुकरण करत असतो. त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे शिक्षकाची प्रत्येक कृती ही आदर्श असली पाहिजे.
शिक्षकाने स्वतःच्या कृतीतून विध्यार्थ्यांना घडवणे : उपदेश कितीही चांगला असला, तरीही त्याला आव्हान हे मिळणारच; परंतु चांगल्या कृतीला मात्र कोणी आव्हान देऊ शकत नाही. म्हणूनच शिक्षकाने आपल्या कृतीतून विध्यार्थ्यांना घडवावे, उदा. वर्गात इतर शिक्षक, अधिकारी किंवा पाहुणे आले की, विध्यार्थ्यांना नमस्कार करायला शिकवतात. त्या वेळी ते स्वतः नमस्कार करत नाहीत. त्या वेळी शिक्षकाने तशी कृती केली, तर विध्यार्थ्यांवर त्याचा प्रभाव जास्त लवकर पडतो.
मुलांना अवांतर वाचन करण्यास सांगतांना शिक्षकांनी एखाद्या पुस्तकातील सूत्रे सांगितली, तर मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागते.
शिकविण्याच्या दोन पद्धती
तात्त्विक अंग : पुस्तकातले घटक वाचून खडू, फळा यांच्या साहाय्याने तोंडी समजावून सांगणे किंवा एखादे शैक्षणिक साहित्य सिद्ध करून त्याद्वारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे. यात पहिल्याच सूत्राचा अधिकाधिक वापर होतो.
प्रायोगिक अंग : प्रत्येक घटक हा तोंडी सांगतांना विध्यार्थ्यांना कृतीतून शिकवला, तर तो अधिक चांगल्या पद्धतीने समजतो.
संस्कारक्षम गोष्टी सांगून त्यातून काय बोध घ्यायचा, हे सांगणे
प्रत्येक घटकाचे आध्यात्मिकरण शिक्षकाने करावे. म्हणजे त्यातून ज्ञानासह संस्कार करणेही शक्य होईल. मनोरंजनातून संस्कार, ज्ञान या गोष्टी शिक्षक एकाच वेळी साध्य करू शकतो, उदा. मोठ्या वर्गात आहार हा पाठ्यपुस्तकातील घटक शिकवतांना चौरस आहार आणि सकस आहार या संकल्पनेचे आध्यात्मिकरण करतांना सात्त्विक आहार आणि तामसिक आहार यांमुळे विचारांवर होणारा परिणाम इत्यादी गोष्टी शिक्षक सांगू शकतात.
संस्कारक्षम वय
वय जितके लहान, तितका संस्कार अधिक रुजतो. सद्गुणांची उपासना ही बाल्यावस्थेतच शक्य होते. विचार आणि कृती चांगल्या होण्यासाठी संस्कारांची आवश्यकता असते. शालेय वय हे संस्कारांसाठी योग्य असते, हे लक्षात घेऊन शिक्षकाने आपले कार्य करावे. असे केल्याने शिक्षक समाजऋण फेडू शकतो. शिक्षकाने कर्तव्यबुद्धीने हे कर्म आचरले, तर अध्यापन ही साधना होईल. अन्नदान, सुवर्णदान यांपेक्षा विद्यादान हे सर्वश्रेष्ठ आहे.
छंदाची जोपासना
छंद म्हणजे एखादी गोष्ट अर्थार्जनाच्या हेतूने न जोपासता केवळ मौज म्हणून, आवड म्हणून मोकळ्या वेळेत करता येण्यासारख्या कृती. यामुळे मुले रिकामी न बसता सतत कोणत्या ना कोणत्या कामात गुंतली जातात. त्यामुळे आयुष्य आनंददायी आणि मन सतत प्रसन्न रहाते. विध्यार्थ्यांचा कल पाहून छंद जोपासण्यास प्रोत्साहन द्यावे. हे सर्व करण्यासाठी शिक्षकाला तपश्चर्या म्हणजे साधना करावी लागेल.’
- श्रीमती वंदना करचे (शिक्षिका), पिंपरी, पुणे.
April 4, 2012, 6:33 pm
हि वेबसाईट खूप छान आहे आणि ती मुलांमध्ये अक्षरशः संस्कार घालणारी आहे
या साईट वर खूप काही वाचण्यासारखे असून मुलांचा आत्मविश्वास वाढविणारी आहे